*रायगडला पाच नवीन रोप-वे प्रकल्पांना मंजुरी; पर्यटन आणि स्थानिक विकासाला मोठी चालना*.
रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला नवी गती देण्यासाठी राज्य शासनाने पाच महत्त्वाकांक्षी रोप-वे प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे ऐतिहासिक, धार्मिक आणि पर्यटन स्थळांपर्यंतचा प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि सोयीस्कर होणार आहे.
मंजूर करण्यात आलेल्या प्रकल्पांमध्ये *नेरळ ते माथेरान, **रायगड किल्ल्याचा पायथा ते रायगड किल्ला, **अलिबाग किनारा ते कुलाबा किल्ला, **घारापुरी (एलिफंटा) लेणी* आणि *अलिबागमधील श्री क्षेत्र कनकेश्वर डोंगर* या महत्त्वाच्या स्थळांचा समावेश आहे.
या रोप-वे प्रकल्पांमुळे पर्यटकांचा प्रवास अधिक सुलभ होणार असून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि लहान मुलांनाही ऐतिहासिक व धार्मिक स्थळांना सहज भेट देता येणार आहे. तसेच पर्यटन व्यवसाय, स्थानिक रोजगार आणि परिसरातील आर्थिक विकासालाही मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हे सर्व प्रकल्प केंद्र सरकारच्या *पर्वतमाला योजने*अंतर्गत राबविण्यात येणार असून, राज्यातील दुर्गम आणि पर्यटनस्थळांना आधुनिक वाहतूक सुविधांद्वारे जोडण्याचा सरकारचा उद्देश आहे. प्रशासनाकडून आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रकल्पांच्या उभारणीचे काम टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे.
Write your comment
Cancel Reply