मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली; एअर इंडियाची दोन विमाने एकाच धावपट्टीवर समोरासमोर;
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी रात्री मोठी विमान दुर्घटना थोडक्यात टळली. एअर इंडियाचे एक विमान दिल्लीकडे उड्डाणासाठी धावपट्टीवर वेग घेत असताना, त्याच वेळी एअर इंडिया एक्सप्रेसचे दुसरे विमान लँडिंगनंतर अद्याप धावपट्टीवरच होते. त्यामुळे काही क्षण दोन्ही विमाने एकाच धावपट्टीवर समोरासमोर आली.
ही धोकादायक परिस्थिती लक्षात येताच हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाने (ATC) तातडीने हस्तक्षेप करत एअर इंडियाच्या विमानाला टेक-ऑफ त्वरित थांबवण्याचे निर्देश दिले. वैमानिकांनी तत्काळ आदेशाचे पालन केल्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
घटना रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती समोर आली आहे. एअर इंडियाने या घटनेची पुष्टी करत विमान सुरक्षितपणे परत पार्किंग बेमध्ये आणण्यात आल्याचे सांगितले. प्रवाशांसाठी पर्यायी उड्डाणाची व्यवस्था करण्यात आली.
या घटनेनंतर विमानतळावरील सुरक्षा प्रक्रिया आणि हवाई वाहतूक व्यवस्थापनाबाबत प्रश्न उपस्थित झाले असून, संबंधित यंत्रणांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. प्रारंभिक माहितीनुसार, एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे मोठी जीवितहानी टळली.
Write your comment
Cancel Reply