१७ वर्षांनंतर भारतात बीडब्ल्यूएफ विश्व बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा; तिकिटविक्रीला सुरुवात
तब्बल १७ वर्षांनंतर भारताला पुन्हा एकदा बीडब्ल्यूएफ (BWF) विश्व बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचे यजमानपद मिळाले असून, स्पर्धेच्या तिकिटविक्रीला अधिकृत सुरुवात झाली आहे. १७ ते २३ ऑगस्ट २०२६ या कालावधीत नवी दिल्ली येथे ही प्रतिष्ठेची स्पर्धा पार पडणार असून, जगातील अव्वल बॅडमिंटनपटू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
आयोजकांनी तिकिटे ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध करून दिली असून, त्यांची प्रारंभिक किंमत ४९९ रुपये ठेवण्यात आली आहे. विविध श्रेणींमध्ये तिकिटे उपलब्ध असून, भारतीय चाहत्यांना मायदेशात जागतिक दर्जाच्या बॅडमिंटन स्पर्धेचा थरार अनुभवण्याची संधी मिळणार आहे.
भारतीय संघाकडून पी. व्ही. सिंधू, लक्ष्य सेन, सात्विकसाईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी यांच्यासह अन्य अव्वल खेळाडूंकडून दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अंतिम भारतीय संघाची घोषणा स्पर्धेपूर्वी करण्यात येणार आहे.
भारताने यापूर्वी २००९ मध्ये हैदराबाद येथे बीडब्ल्यूएफ विश्व अजिंक्यपद स्पर्धेचे यजमानपद भूषवले होते. त्यानंतर तब्बल १७ वर्षांनी ही स्पर्धा पुन्हा भारतात होत असल्याने भारतीय बॅडमिंटनसाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. स्पर्धेच्या आयोजनासाठी आवश्यक तयारीला वेग देण्यात आला असून, देश-विदेशातील मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित राहण्याची अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.
Write your comment
Cancel Reply